नेहमी जवळ बाळगायचो मी,
माझी कवितांची वही..
त्यातल्या प्रत्येक कवितेखाली,
माझी तारखेसह सही..
माझं अस्तित्व संपलं मग,
आणि तिला नुरला कोणी वाली..
घेऊन जाणे न जमले मला,
तिला माझ्यासह माझ्या आभाळी..
हाल अपेष्टा खूप भोगल्या तिने,
स्वतःचीच पाने जाळून भागवली भूक..
कॉपीराईट आणि पेटंटच्या जमान्यात,
पार विद्रुप झाले तिचे रूप..
तिच्यातील कवितांची झाली मग गाणी,
मीटर मध्ये बसवता,
गेली सारी रया..
प्रत्येकाने आपले नाव, जोडले तिच्यासोबत,
कोऱ्या कागदांवर नव्याने,
छापली तिची काया..
बाजार मांडून तिचा,
ओळ न् ओळ विकली..
तिच्या ओळींचे घेऊन बीज,
इतर बरीच शेते पिकली..
एक दिवस असा आला,
की ओरबाडण्या काही नुरले शिल्लक..
मग त्यांनी तिला रद्दीत विकुन,
कमवली काही रक्कम क्षुल्लक..
तुम्हाला सारं सांगतोय कारण ....
रद्दीतल्या एखाद्या पानावरचं,
अक्षर ओळखीचं वाटता,
क्षणभर थांबा..
कवितेखाली सही माझी असेल,
तर कविता कशी वाटली,
एवढं जरूर सांगा..!!
....कविता कशी वाटली,
एवढं जरूर सांगा..!!
- AKshay Pujari